बाळासाहेब शेटे पाटील
मो. नं. ७०२८३५१७४७
लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगर शहर आणि परिसरात फार पूर्वी अस्तित्वात असलेले तब्बल ४१ ओढे आणि नाले सध्या गायब झालेले आहेत. या ओढे आणि नाल्यांच्या जागेत प्रचंड अशी अतिक्रमणं झालेली आहेत. मात्र केंद्र सरकारकडून राज्य सरकारला गेल्या दहा वर्षांपासून या ४१ ओढे आणि नाल्यांच्या साफसफाईसाठी दरवर्षी तब्बल ५५ लाख रुपयांचा निधी या महापालिकेला प्राप्त होतो. परंतू हा निधी कोणत्या ‘हेड’खाली खर्च होतो, या निधीअंतर्गत आतापर्यंत या शहरातले किती ओढे आणि नाल्यांची साफसफाई करण्यात आली, या ४१ ओढे आणि नाल्यांपैकी आजमितीला किती ओढे आणि नाले सुस्थितीत आहेत, किंबहूना किती ओढे आणि नाले सध्या अतिक्रमणमुक्त आहेत, ही माहिती द्या. अहिल्यानगर शहर आणि परिसरातले ४१ ओढे दाखवा, त्यावर होणाऱ्या ५५ लाख रुपयांच्या खर्चाचा हिशोब द्या, अशी मागणी या शहराचे वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्ते ‘अँग्री ओल्ड मॅन’ शशिकांत चंगेडे यांनी केली आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते चंगडे हे अहिल्यानगर महापालिकेच्या दारात लवकरच करणार आमरण उपोषण करणार आहेत. विशेष म्हणजे या अतिशय गंभीर आणि महत्त्वाच्या विषयावर अहिल्यानगर शहरातला एकही नागरिक किंवा लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. अशा परिस्थितीत शशिकांत चंगेडे यांनी एकाकी संघर्ष उभा केला आहे. यावर्षी प्रचंड तापमान आहे. निसर्गनियमाप्रमाणे जास्तीत जास्त बाष्पीभवन झाल्यानंतर पर्जन्यवृष्टी त्याच प्रचंड प्रमाणात होत असते. दरम्यान, केंद्र सरकारकडून राज्य सरकारमार्फत अहिल्यानगर महापालिकेला ओढे आणि नाले दुरुस्तीसाठी किंवा साफसफाईसाठी ५५ लाख रुपयांचा निधी दरवर्षी येतो असा या वर्षीदेखील आलाय, असं चंगेडे यांचं म्हणणं आहे. त्या अनुषंगानं या ५५ लाख रुपयांच्या निधीतून आतापर्यंत अहिल्यानगर महापालिकेनं किती ओढे आणि नाल्यांची साफसफाई केली, असा सवाल शशिकांत चंगडे यांनी उपस्थित केला आहे.
येत्या १५ मे पर्यंत अहिल्यानगर शहर आणि परिसरातले ओढे आणि नाल्यांची साफसफाई करायची आहे. आज एक मे आहे. येणाऱ्या १४ दिवसांमध्ये ४१ ओढे आणि नाल्यांची साफसफाई होईल का, असाही चंगेडे यांचा प्रश्न आहे. या संदर्भात आमरण उपोषण करण्यासह या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (अँटी करप्शन ब्युरो) तक्रार करण्याची तयारीदेखील चंगेडे यांनी केली आहे.
नगरकरांनो, तुमची झोप झालीय का?
अहिल्यानगर (पूर्वीचं अहमदनगर) या शहराला पाचशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. या शहर आणि परिसरात फार पूर्वी प्रचंड प्रमाणात नैसर्गिक सुबत्ता होती. सगळीकडे मोठमोठी डेरेदार झाडं होती. ओढे नाले खळखळून वाहत होते. एक प्रकारे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे जंगल होतं. मात्र ठेकेदारांच्या नादाला लागून या शहराच्या आतापर्यंतच्या पुढार्यांनी अहिल्यानगर शहर आणि परिसरात सिमेंटचे जंगल उभारलं आणि ४१ ओढे नाले बुजवून टाकले. त्याठिकाणी मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या केल्या. नैसर्गिक प्रवाह अडविल्यामुळे भविष्यातदेखील महापुराचा मोठा धोका या शहराला भेडसावत आहे. दुर्दैवानं या शहरातले नागरिक मात्र अजूनही झोपेतच आहेत. या गंभीर विषयावर कोणीही बोलत नाही. त्यामुळे नगरकरांनो, तुमची झोप झालीय का, असा जाहीर सवाल उपस्थित करावासा वाटतो.