लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागात सध्या जे काही सुरु आहे, त्यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी खरं तर अनेक बातम्यांची आवश्यकता आहे. टप्प्याटप्प्याने त्या सर्व बातम्या अवश्य केल्या जातील. पण तूर्तास अहिल्यानगर महापालिकेचा हा जो काही अजब कारभार आहे आणि त्या कारभाराअंतर्गत या महापालिकेच्या आरोग्य विभागाची अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण जबाबदारींचं केंद्रीकरण करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. एकच डॉक्टरवर अनेक विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या बिचार्या एका डॉक्टरने नक्की कोणकोणती कामं करायची? त्यामुळे अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना जाहीरपणे विचारवसं वाटतं, की ‘बच्चे की जान लोगे क्या’? या महानगरपालिकेतले अन्य डॉक्टर्स फक्त लाखो रुपयांचा पगार घेण्यासाठीच आहेत का?
अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागाचा विस्तार खूप मोठा आहे. या शहरातल्या आणि उपनगरातल्या गगनचुंबी इमारतींत असलेल्या अनेक खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याचं काम या एकाच डॉक्टरकडे आहे. याशिवाय महापालिकेचे अनेक दवाखाने आहेत. त्याबरोबरच महापालिकेचा कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्याचं कामदेखील याच डॉक्टरकडे आहे. आरोग्य विभागाअंतर्गत कचरा डेपो येतो. यावरही नियंत्रण याच डॉक्टरला ठेवायचं आहे.
राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्याच्यादृष्टीने नगरकरांसाठी ज्या काही आरोग्याच्या कल्याणकारी योजना आहेत, त्या सर्व योजनांची अंमलबजावणी याच डॉक्टरला करायची आहे. सातत्याने होणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या बैठकांनादेखील या एकाच डॉक्टरला जायचं आहे. अहिल्यानगर शहर आणि परिसरातल्या रुग्णालयांच्या परवाना नूतनीकरणाची जबाबदारी याच डॉक्टरवर आहे.
आयुक्त डांगे, ‘ते’ डॉक्टर यंत्र किंवा मशीन नाही…!
वास्तविक पाहता एखादं संगणक, मशीन किंवा यंत्र बराच वेळ चालवलं तर ते गरम होऊन स्फोट होण्याचा धोका असतो. अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागात अनेक विभागांची जबाबदारी पाहत असलेले डॉक्टर हेदेखील एक माणूसच आहेत. त्यांच्यावरदेखील अनेक प्रकारच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक मर्यादा आहेत. त्यामुळे अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी महापालिकेचा आरोग्य विभाग सांभाळणारे एकटे डॉक्टर हे यंत्र किंवा मशीन नाही, किमान एवढं तरी भान ठेवायला हवंय.
जबाबदारीचं विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता…!
लोकपत डिजिटल मिडियाचा ही बातमी देण्याचा उद्देश हा आहे, की एकट्या माणसावर अनेक प्रकारची जबाबदारी टाकल्यानंतर त्या माणसाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या चुका होऊ नये, नागरी आरोग्याचे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होऊ नयेत, अनेक प्रकारच्या विभागांची जबाबदारी सांभाळत असताना हे डॉक्टर स्वतः आजारी पडू नयेत, यासाठी जबाबदारीचं विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचं नगरकरांच्या निदर्शनात आणून द्यावं. हे करत असताना अहिल्यानगर महापालिकेच्या आरोग्य विभागात जे अनेक डॉक्टर आहेत, त्या प्रत्येक डॉक्टरांवर आयुक्त डांगे यांनी वेगवेगळी जबाबदारी सोपवून द्यावी, हा खरं तर लोकपत डिजिटल मिडियाचा उदात्त हेतू आहे.