लोकपत न्यूज नेटवर्क / बीड
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता तब्बल 50 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. या हत्याकांडातल्या एक सोडून सर्वच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. पोलीस त्याला अटक का करु शकले नाहीत? त्याच्याकडे मोठा पुरावा आहे का? तो पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा घातपात करण्यात आलाय का? अशा अनेक प्रकारच्या वावड्या उठविल्या जात आहेत. कृष्णा आंधळेला अटक करण्यात पोलिसांना अपयश येत असल्यामुळे अशा प्रकारच्या उलटसुलट चर्चा प्रसारमाध्यमांद्वारे होत आहेत.
बीडमध्ये पत्र्याच्या घरात राहणारा आणि पोलीस भरतीची तयारी करणारा कृष्णा आंधळेला आई-वडिलांच्या बाबतीत फारसं गांभीर्य नाही. अनेक दिवस तो घरापासून लांब राहत असल्याचे सांगितलं जात आहे. दरम्यान, या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे. प्रतिक घुले, महेश केदार यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मकोकाही लावण्यात आला. पण कृष्णा आंधळेचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो अजून सापडलेला नाही. त्याच्यावरही मकोका लावण्यात आला. आता त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे.
कृष्णा आंधळे हा अनेक राज्यं बदलून फरार झाला आहे. सध्या तो कोणत्या राज्यात आहे, याविषयी पोलिसांना काहीही माहित नाही. कृष्णा आंधळेकडे मोबाईल नसल्यामुळे त्याचं टॉवर लोकेशन मिळत नाही. विशेष म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात ज्याला ‘मास्टरमाईंड’ समजलं जात होतं, तू वाल्मीक कराड पोलिसांना शरण आला. परंतु कृष्णा आंधळे अद्यापही फरारच आहे.