लोकपत न्यूज नेटवर्क / बीड
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झाले आहेत. या हत्येप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या हत्याकांडाचा ज्याला ‘मास्टरमाईंड’ म्हटलं जातंय, तो वाल्मीक कराड पोलिसांना यापूर्वीच शरण आला आहे. असं असलं तरी या गुन्ह्यातला कृष्णा आंधळे
मात्र अद्यापही मोकाटच आहे. कृष्णा आंधळेला पकडायचं सोडून मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील
यांनाच ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ‘व्वा रे सरकार आणि व्वा रे सरकारी यंत्रणा’, असं म्हणत या राज्यातली हतबल झालेली जनता स्वतःच्याच कपाळावर हात मारुन घेत आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाची हवा काढून घेण्यासाठी किंबहुना मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा निष्प्रभ करण्यासाठी सरकारकडून आष्टीचे आमदार सुरेश धस यांना ‘लॉन्च’ केलं जात तर नाही ना, अशी शंका यानिमित्तानं व्यक्त केली जात आहे.
वाल्मीक कराड अन्य आरोपींविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यासह मकोका लावण्यात आला आहे. मात्र कराड याच्यापेक्षा आंधळे मोठा आहे का, तब्बल दोन महिन्यानंतरदेखील पोलिसांना तो का सापडत नाही, कृष्णा आंधळेला नक्की कोण पाठीशी घालत आहे, कृष्णा आंधळेला कोणी लपवलं आहे, साध्या पत्र्याच्या घरात राहणाऱ्या कृष्णा आंधळेचा महाराष्ट्र पोलिसांना इतक्या दिवसांनंतरही सुगावा कसा लागत नाही, महाराष्ट्र पोलीस दलात असलेले गुप्तवार्ता विभागाचे पोलीस नक्की काय करताहेत, कृष्ण आंधळेचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी राज्याच्या पोलीस दलाचे ‘सोर्स’ संपलेत का, हे असंच सुरु राहिलं तर देशमुख कुटुंबियांना नक्की न्याय मिळेल का, या हत्याकांडातल्या आरोपींना खरंच फाशीची शिक्षा होईल का, हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहे.