लोकपत न्यूज नेटवर्क / बीड
धनंजय नागरगोजे…! बीड जिल्ह्यातल्या केळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक. 2019 मध्ये राज्य सरकारने 20 टक्के अनुदान घोषित करण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे धनंजय नागरगोजे आर्थिक अडचणीत होते. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्याचं समजतंय. एकूणच, या घटनेनंतर बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे. पण एक सांगायचं आणि विचारायचंय, धनंजय नागरगोजे सर, खरंच चुकलात तुम्ही. अहो, कुत्र्यांना घाबरुन कोण मरतं का?
काय, लिहिलंय, धनंजय नागरगोजे सरांनी, ते आता वाचा. बीड शहरातल्या कृष्णा अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेडच्या केज शाखेजवळ धनंजय नागरगोजे या शिक्षकानं टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केलीय. धनंजय अभिमान नागरगोजे असं या 30 वर्षीय शिक्षकाचं नाव. स्वत:चं आयुष्य संपवताना त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये आरोपींच्या नावाचाही उल्लेख केलाय.
नागरगोजे सरांनी हे टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अनेक फेसबूक पोस्ट केल्या. त्यात नागरगोजे सर म्हणताहेत, ‘हे लोक मला हाल हाल करुन मारतील, मोठे लोक मला मारतील. मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही’. अशा अनेक पोस्ट धनंजय नागरगोजे यांच्या फेसबूकवर टाकलेल्या दिसल्या.
स्वत:ला संपविण्याआधी एक सविस्तर पोस्ट करत नागरगोजे सरांनी त्यांच्या मुलीची माफीही मागत त्रास देणाऱ्यांची नावंही पोस्टमध्ये लिहिली आहेत. ‘श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर. मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती. पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले काय करु? माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. कधी मी कुणाला दोन रुपयांना फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही’.
‘श्रावणी बाळा, शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ. कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे. तुला अजून काही कळत नाही. तुझं वय आहेच किती? तीन वर्षांत तुला काय कळणार? ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा, बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगलाच वागला. पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे’.
‘विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्र्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हाल हाल करून मारणार आहेत. मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं, की मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झालं, काम करतोय. अजून मला पगार नाही. आता पुढे काय करायचं?
त्यावर विक्रम बप्पा म्हणाले, तू फाशी घे. म्हणजे तू मोकळा आणि मीपण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा. हे एकूण माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तीतून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली’.
‘श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत. या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती. पण मी एक दळभद्री बाप, तुझ्या वाट्याला आलो. काय करु? माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवलाच नाही.
बाळा, डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्याशिवाय पर्यायच नाही. श्रावणी मला माफ कर. माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही मी. तरी पण शक्य झालं, जेव्हा तुला कळेल तेंव्हा माफ कर. आता मी थांबतो. खूप त्रास होतोय मला. विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे, गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत. कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे. यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवित आहे. आत्तापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानी माफ करावे. सर्वांना माझा शेवटचा राम राम’.
तरीही आत्महत्या अखेरचा पर्याय नसतो ना सर? मनातून खसलेल्या विद्यार्थ्यांना तुम्हीच असं मार्गदर्शन केलं होतं ना सर? बघ आता तुम्हीच हा टोकाचा निर्णय का घेतला? पोलीस यंत्रणा, कायदा, कोर्ट यावर तुमचा विश्वास नव्हता का सर? मग आता तुम्हीच सांगा, तुमच्या हाताखाली शिकून मोठा झालेल्या विद्यार्थ्यांनी तुमचा नक्की कोणता आदर्श घ्यायचा? पुन्हा पुन्हा तेच विचार असं वाटतं, कुत्र्यांच्या भीतीने कोणी मरतं का सर?