लोकपत न्यूज नेटवर्क / नेवासा
नेवासे तालुक्यातल्या सोनईनजिक असलेल्या धनगरवाडी परिसरातून हजारो ब्रास मुरुम बेकायदेशीररित्या वाहून नेला जात आहे. राष्ट्रीय संपत्ती असलेल्या या गौण खनिजचं प्रचंड प्रमाणात उत्खनन होत असताना नेवासा तालुक्याचे तहसीलदार संजय बिरादार हे मात्र गप्प आहेत. या पार्श्वभूमीवर तमाम नेवासकरांच्यावतीने ‘लोकपत’ न्यूज नेटवर्कने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते प्रश्न असे आहेत, नेवाशाचे तहसीलदार संजय बिरादार, धनगरवाडीच्या ‘त्या’ मुरुमाचा बाप कोण? या परिसरातला मुरुम तस्कर नक्की समोर येणार का? मुरुमाच्या तस्करीसाठीचा जेसीबी, डंपर कोणाचा? गौण खनिजचा उपसा होत असताना तुम्ही गप्प का आहात? या सर्व प्रश्नांची उत्तरं नेवाशाच्या जनतेला मिळतील का, हाच खरा प्रश्न आहे.
धनगरवाडीच्या ज्या परिसरातून हा मुरुम अनधिकृतरित्या विकला जात आहे, त्या जमिनीच्या उताऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन’ एवढंच नाव आहे. मात्र या मुरुमाच्या तस्करीची जबाबदारी धनगरवाडी ग्रामपंचायत घ्यायला तयार नाही. तलाठी, मंडलाधिकारी ही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. या मुरुमाची तस्करी नक्की कोण करतंय, रात्री अपरात्री धनगरवाडी शिवारातून दररोज अनेक डंपर्स भरुन मुरुम नक्की कुठं विकला जात आहे, स्थानिक महसूल विभागानं या ठिकाणचा पंचनामा केला असला तरी या मुरुमाचा तस्कर नक्की कोण, हे कधी जनतेसमोर येणार आहे?
धनगरवाडी परिसरात नेवाशाच्या महसूल विभागाने पाझर तलावाचं काम केले आहे. या पाझर तलावाच्या भिंतीपर्यंत मुरुमाचं उत्खनन करण्यात आलेलं आहे. भविष्यात जर प्रचंड पाऊस झाला तर पाझर तलावाची भिंत फुटून पावसाचं पाणी थेट सोनईपर्यंत येऊन धडकणार आहे. संभाव्य प्रचंड पावसामुळे सोनईत महापूर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य महापुरामुळे सोनईत जीवित हानी झाल्यानंतरच नेवाशाचे तहसीलदार संजय बिरादार हे खडबडून जागे होणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या गंभीर मुद्द्यासदर्भात ‘लोकपत’ न्यूज नेटवर्कने यापूर्वी प्रसारित केलेली बातमी पुन्हा एकदा प्रसारित करत आहोत…!
आमदार विठ्ठलराव लंघे…! तुमचं तरी आहे का याकडे लक्ष…?
सोनईनजिकच्या धनगरवाडी शिवारातून हजारो ब्रास मुरुमाची तस्करी करण्यात येत असताना नेवासाचा महसूल विभाग अजूनही गाढ झोपेतच आहे. नाही म्हणायला, या विभागानं घटनास्थळाचा थातूरमातूर पंचनामा केला असला तरी या मुरुमाचा तस्कर नक्की कोण आहे, हे शोधून त्याच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची आणि त्या तक्रारीनुसार संबंधित मुरुमाच्या तस्कराविरुद्ध गुन्हा दाखल केला जाण्याची आवश्यकता आहे.
कोणाच्या आशिर्वादानं धनगरवाडीच्या मुरुमाची तस्करी सुरु आहे? या तालुक्याचे दमदार आमदार विठ्ठलराव लंघे
यांचं तरी या गंभीर मुद्द्याकडे लक्ष आहे का, असा प्रश्न सोनईची जनता विचारत आहे.