बाळासाहेब शेटे पाटील
लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अनाथ मुला – मुलींचं संगोपन करणाऱ्या अहिल्यानगरच्या स्नेहालय, सावली आणि युवान या सामाजिक संस्थांनी या शहराचं नाव संपूर्ण राज्यात झळकवलं आहे. परंतू या संस्थांमध्ये मुला – मुलींची लग्नं लावली जात नाहीत, ही महत्त्वाची बाब सर्वांनी लक्षात घ्यायला हवी आहे. दुर्दैवानं या आणि अशा काही बनावट संस्थांच्या अर्धवट नाव आणि पत्त्याचा वापर करत लग्न करण्याची इच्छा असलेल्या तरुण-तरुणींसह त्यांच्या पालकांची महाराष्ट्राबाहेरचे भामटे आर्थिक फसवणूक करत आहेत. या सर्व ‘स्कॅम’मध्ये अहिल्यानगर शहराची मात्र प्रचंड बदनामी होत आहे. लग्न करण्याची इच्छा असलेल्या तरुण-तरुणींना आणि त्यांच्या पालकांना आम्ही असं आवाहन करत आहोत, की या भामट्यांवर विश्वास ठेवू नका…!
अहिल्यानगरचे आमचे मित्र असलेले ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर या महत्त्वाच्या आणि गंभीर विषयासंदर्भात अतिशय अभ्यासपूर्ण भाष्य केलं आहे. बाहेरच्या राज्यातले भामटे लग्नाची इच्छा असलेल्या तरुण – तरुणींसह त्यांच्या पालकांना आकर्षित करण्यासाठी ‘आमच्या आश्रमात लग्नासाठी मुली उपलब्ध आहेत. तुम्ही अहिल्यानगरच्या ‘तपोवन, केडगाव’ इथं आमच्या आश्रमात मुली पहायला या’, अशा पद्धतीची जाहिरात करतात. भोळेभाबडे तरुण आणि त्यांचे पालक या जाहिरातीला बळी पडतात.
वास्तविक पाहता अहिल्यानगरचं तपोवन आणि केडगाव हे दोन स्वतंत्र आणि वेगवेगळे परिसर आहेत. परंतू अहिल्यानगरच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना याविषयीची कल्पना नसते. लग्न करु इच्छिणाऱ्या तरुणांकडून हे भामटे ऑनलाईन फॉर्म भरून घेतात आणि त्यासाठी ते दहा हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगतात. फोन पे किंवा गुगल पे वर दहा हजार मिळाल्यानंतर हे भामटे लग्नासाठी इच्छुक असलेले तरुण आणि त्यांच्या पालकांना अक्षरशः मुर्खात काढतात. आर्थिक फसवणूक झालेले पालक कपाळावर हात मारुन घेत आल्या पावली परत त्यांच्या घरी जातात. दहा हजारांसाठी कोणीही
पोलीस ठाण्यात तक्रार देत नाहीत.
ज्येष्ठ पत्रकार विजयसिंह होलम यांनी या संदर्भात काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र या संस्थेत मुला – मुलींची लग्नं लावून दिली जात नाहीत. लग्नाची इच्छा असलेले तरुण त्यांच्या पालकांसह अहिल्यानगरमध्ये येतात. मात्र त्यांना ‘तपोवन, केडगाव’ हा पत्ताच सापडत नाही. कारण हा पत्ताच पूर्णतः चुकीचा आहे. रिक्षाचालकांमुळे संबंधित पालक स्नेहालय किंवा सावली अशा संस्थांमध्येसुद्धा जातात. मात्र तिथं त्यांना खरी माहिती दिली जाते आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येतं.
अशा ‘मॅरेज स्कॅम’पासून पालकांनी सावधपणाची भूमिका घेण्याची गरज आहे. हल्ली मुलींचं प्रमाण कमी झाल्यामुळे लग्नासाठी मुलीच उपलब्ध होत नाहीत. ज्या मुली उपलब्ध होतात, त्यांच्या अपेक्षा वेगळ्याच असतात. त्यामुळे पालकांचा नाईलाज होतो आणि ते अशा ‘मॅरेज स्कॅम’मध्ये फसले जातात. यासाठी संबंधित पालकांनी खरं तर संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची आवश्यकता आहे. असं झालं तरच ‘मॅरेज स्कॅम’ करणारे महाराष्ट्राच्या बाहेरचे भामटे पकडले जातील आणि अहिल्यानगरची बदनामी थांबेल.