लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगरच्या मुकुंदनगरजवळ दर्गदायरा परिसरात अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण करण्यात आलीय. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत थरकाप उडवणारी ही घटना घडली आहे. मात्र भिंगार कॅम्प पोलीस म्हणताहेत, लेखी तक्रार नाही. त्यामुळे आम्ही काहीही करु शकत नाही.
केवळ 16-17 वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलांना चार नराधमांनी केबल वायरने पंधरा ते वीस मिनिटं बेदम मारहाण केली. जीवाच्या आकांताने ती मुलं ‘माफ करा’ म्हणत विनवणी करत होती. पण त्या नराधमांना दया काय असते, याचा पत्ताच नव्हता.
या अमानुष मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीडचे सरपंच कै. संतोष देशमुख आठवण होणं स्वाभाविकच आहे. जेव्हा ही मुले रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोहोचली. तेव्हा शेजाऱ्यांची मनं सुन्न झाली. लोकांनी तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गाठून आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ अर्ज लिहून घेतला आणि नागरिकांना रिकाम्या हातानं परत पाठवलं.
दरम्यान, पिडितांना मदत करणाऱ्या नागरिकांवरच उलट बोगस गुन्हा दाखल करण्यात आल्याचं बोललं जात आहे. नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांचे उत्तर होतं, आई-वडील तक्रार करत नाहीत. तोपर्यंत आम्ही काही करु शकत नाही. भिंगार कॅम्प पोलिसांचं हे कुठलं न्यायधोरण आहे? पोलीस स्वतःही अशा गंभीर प्रकरणात फिर्यादी होऊ शकतात, हे त्यांना ठाऊक नाही का?
फोटो, जखमा, साक्षीदार असतानाही केवळ अर्ज घेऊन मूळ गुन्हा नोंदवला नाही आणि उलट बिनपुराव्याच्या आधारावर आरोपींनीच अन्याय केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हे संपूर्ण प्रकरण पोलीस यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतं आहे.
स्थानिक लोकांचा स्पष्ट आरोप आहे, की आरोपींनी पिडितांच्या कुटुंबियांवर दबाव आणला, धमक्या दिल्या आणि हे प्रकरण आर्थिक तडजोडीच्या वासाने भरलेलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घ्यावी,
आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी. अन्यथा न्यायासाठी एक तीव्र जनआंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे.