बाळासाहेब शेटे पाटील / अहिल्यानगर
दोन दिवसांपूर्वी (दि. २ जून) अहिल्यानगर जिल्ह्याचे एस.पी. सोमनाथ घार्गे
यांनी अहिल्यानगर शहर आणि परिसरातल्या पत्रकारांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. सुरुवातीला एस.पी. घार्गे यांनी या जिल्ह्यातल्या जामखेड आणि नगर शहराच्या उपनगरात झालेल्या गोळीबारासंदर्भात उपस्थित पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.
‘पोलीस प्रशासनाचे काही चुकत असलं किंबहूना अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातल्या माझ्यासह कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याचं काही चुकत असल्यास त्याची अगदी बिनदिक्कतपणे बातमी करा, त्या बातमीविषयी मी आणि पोलीस दलातले आमचे सहकारी कुठलीही नाराजी दर्शविणार नाहीत. हे करत असताना चांगल्या कामाला ठळक प्रसिद्धी द्या, असं आवाहन एस.पी. घार्गे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं.
एस.पी. घार्गे यांनी यापूर्वी २००७ मध्ये पोलीस उपअधीक्षक या पदावर श्रीरामपूर विभागात काम केलेलं आहे. एका गुंडाच्या पायावर गोळी मारण्याचं धाडस त्यावेळी त्यांनी दाखवलं होतं, हे या जिल्ह्यातल्या जनतेला चांगलंच माहित आहे.
एस.पी. घार्गे यांच्या या धाडसाची आठवण करत त्यांना आम्हाला जाहीरपणे विचारायचंय, की एस. पी. सोमनाथ घार्गे साहेब, गुंडांच्या गुडघ्यांवर गोळ्या घालाल का? अहिल्यानगर जिल्ह्यातल्या ठराविक तालुक्यांमध्ये गावठी कट्टे नक्की कुठून येतात, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे या गावठी कट्ट्यांचं ‘कनेक्शन’ खरं तर शोधून काढण्याची आवश्यकता आहे. हे काम एस.पी. घार्गे हे करतील का, असा या जिल्ह्यातल्या जनतेचा प्रश्न आहे.
पोलिसांपेक्षा गुंड चांगले…?
हल्लीच्या मिसरुढ फुटलेल्या तरुणांमध्ये या गुंडांची चांगलीच ‘क्रेझ’ असल्याचं पाहायला मिळत आहे. याचं कारण सांगायचं झालं तर गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी ग्रामीण भागांतल्या पोलीस ठाण्यात होत असलेली टाळाटाळ. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर हे गुंड सामान्य माणसावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वात आधी संबंधितांकडे धाव घेतात. त्यामुळे पोलिसांपेक्षा तरुणांना आणि सामान्य माणसाला हे गुंड चांगले वाटताहेत.
राजकारणीच आहेत या गुंडांचा ‘पोशिंदा’…!
गळ्यात सोन्याच्या साखळ्या, बोटांत जाडजूड अंगठ्या, अंगावर खादीचे आणि कधी कधी काळा शर्ट जीन्स पॅन्ट असे कपडे घालणारे, कपाळाला टिळा लावणारे आणि कमरेला गावठी कट्टे अडकवून दहशत निर्माण करणारे गुंड वाळूच्या धंद्यात चांगलेच सक्रिय झालेले आहेत. या जिल्ह्याची पोलीस यंत्रणा अशा गुंडांचा बिमोड करण्यासाठी अजिबात असमर्थ किंवा हतबल नाही. परंतू राजकीय पुढार्यांच्या वरदहस्तामुळे पोलीस यंत्रणेचा नाविलाज होतो. अशा गुंडांपासून राजकारणी मंडळींना मोठा आर्थिक फायदा होतो. खरा विचार केला तर राजकारणी मंडळी हेच या गुंडांचा ‘पोशिंदा’ आहेत, असं म्हटल्यास ती अतिशयोक्ति ठरणार नाही. अशा विचित्र परिस्थितीमध्ये एस.पी. घार्गे यांना या जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी एका अर्थानं तारेवरची कसरत करायची आहे.